Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 20 मे 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन

sana लिखित.. विभाग पर्यटन

मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो. आम्ही विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. फिरणारी माणसं वेगळी. आम्ही फक्त वर्षातून एकदा मामाकडे आणि गावाला जायचो.

आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.

त्याबद्द्ल नंतर लिहू आता आपण जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांकडे एक नजर टाकू.

सुरवात कणकवलीपासूनच. कारण जिल्ह्याच्या मध्यवर्ती शहरातच रेल्वे स्थानक, हॉटेल्स व एसटी स्टँड यासगळ्यामुळे बहूतांश पर्यटक कणकवलीपासुनच फिरायला सुरवात करतात.

कणकवली - भालचंद्र महाराज

सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित भालचंद्र महाराज हे एक प्रसिध्द योगी पुरुष होऊन गेले. भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. कणकवली शहरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात. अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे.  इथे आल्यावर मन:शांती लाभते.

गोपुरी आश्रम, कणकवली

कोकणगांधी सिताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी आश्रम कणकवलीत वागदे येथे गडनदीच्या तिरावर आहे. त्यांनी गोपुरीत कृषी क्षेत्रातून रोजगार कला उपलब्ध करता येईल हे कृतितून सिध्द करुन दाखविले आहे. त्यांचा आदर्श जपणार्‍या त्यांच्या अनुयायांनी शेती, फळप्रक्रिया उद्योगात आता भरीव कामगिरी केली आहे.

भिरवडेंचे रामेश्वर देवालय

येथील रामेश्वर मंदिर डोंगराच्या कुशीत आहे. देवालयाबरोबरच येथील निसर्गसौंदर्यही भाविकांच्या भक्तीमय आनंदात अमोल ठेवा निर्माण होतो.

घोणसरीचा शिवगड किल्ला

निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसराच्या सान्निध्यात हा  ऐतिहासिक साक्ष देणारा किल्ला पर्यटकांना कायम खुणावतो. तेथे भवानी मातेचे देवालय आहे.

वैभववाडी

नावातच वैभव असणार्‍या नैसर्गिक ओतप्रोत भरलेली वैभववाडीतील पर्यटन स्थळे :

नापणेचा धबधबा

या धबधब्याचा उगम नाधवडे या गावी झाला आहे. तळेरेपासून १६ कि.मी. वर काहीसा आडबाजूला हा धबधबा आहे.  हा धबधबा बारमाही कोसळत असतो. पाण्यामध्ये गंधकाचा अंश असल्याने येथील पाण्याने स्नान केल्यास त्वचाविकार बरे होतात असे आरोग्यतज्ञांचे मत आहे. त्यामुळे पर्यटकांसोबत त्वचा विकाराने ग्रासलेले लोक येथे भेट देत असतात.

ऐनारी डोंगरातील लेणी

वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचिन गुंफा असून त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. गुंफा अद्याप दुर्लक्षित असून आत काळोख असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे लागते.

देवगड

देवगड हापूस आंब्याबरोबरच येथील पर्यटन स्थळे ही पर्यटकांना मनतृप्त आनंद देतात.

देवगड किल्ला

देवगडचा किल्ला हापूस आंब्याइतकाच प्रसिध्द आहे. त्याची ख्याती पर्यटकाला निश्चित आकर्षित करते. येथील किनारा व हापूस आंब्याची ही रोचकता औरच आहे.

विजयदुर्ग

सहा हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या जलदुर्गाची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. हा किल्ला पूर्वी मराठा आरमाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते. किल्ल्यामध्ये मंदिर, विहीर तसेच युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी एक कोठडी आहे. पाण्याच्या टाक्या,पडके महाल, तोफा आजही या किल्ल्यावर आहेत. किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे सुमारे २ कि.मी. अंतर असलेले एक भुयार असून धुळपांच्या वाडयातून बाहेर पडते. १६५३ साली काबीज केलेला हा किल्ला शिवरायांच्या आरमारात समाविष्ठ पहिला "जलदुर्ग" म्हणून यांची विशेष नोंद आहे. सध्या विजयदुर्ग हे एक उत्तम मासेमारी बंदर म्हणून उदयास येत आहे.

वाडा येथील विमलेश्वर मंदिर

देवगड पासून ६ कि.मी. अंतरावर विमलेश्वराचे सुंदर देवालय आहे. समुद्राच्या लाटांनी खळाळणार्‍या व डोंगराच्या सान्निध्यात विसावलेल्या या मंदिरात शिवपिंडी येणार्‍यांचे विशेष लक्ष वेधून घेते. या देवालयाच्या दोन्ही बाजुला खोदीव हत्ती आहेत. मंदिरासह येथील परिसरही विशेष प्रेक्षणीय आहे.

मिठबाब तांबळडेग किनारा

हा किनारा अतिशय स्वच्छ व शुभ्र वाळूचा आहे. या किनार्‍यावर गणबादेवीचे देवालय असल्याने पर्यटक समुद्र किनार्‍याचा मनसोक्त आनंद लुटता-लुटता गणबादेवीच्या पावलावरही लीन होतात.

कुणकेश्व्वर मंदिर

निसर्गरम्य सौंदर्यस्थळ व जागृत धार्मिक स्थान असा दुहेरी संगम असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व परिसरातील लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत येथे जत्रोत्सव संपन्न होतो. शिवमंदिरासह येथील किनार्‍याचा परिसर येथे येणार्‍याला सुखावतो.  मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस पायर्‍यांवर लोळण घेणार्‍या सागराची विविध रुपे न्याहाळता येतात.

कुडाळ

जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे जिल्हा मुख्यालय म्हणून जिल्हा प्रशासनाची जिल्हा कार्यालये आहेत. अतिशय आकर्षक पध्दतीने या इमारती उभ्या आहेत.

वालावल

येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे प्राचीन व उत्कृष्ठ शिल्पाकृती असलेले देवालय आहे. या देवालयाची रचना, लाकडी कोरीव काम, अंतर्भागाची सजावट, बाजूस असलेला तलाव, त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. चंद्र - सूर्याचे दर्शन येथे एकाच वेळी घडते. मंदिराचे उत्तरेस वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे.

संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी

कुडाळ पिंगुळी येथील भक्त वत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभार्‍यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे.

दत्तमंदिर, माणगाव

हे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली आहे. तेथे राहण्याची सोय उपलब्ध आहे.

वेंगुर्ला

वेंगुर्ला बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनार्‍यावरील आयात - निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.  या बंदरासमोर असलेलं शासकिय निवासस्थान म्हणजे 'सागर बंगला'. ब्रिटिश राजवटीपासून अथांग समुद्राचे दर्शन घडविणार्‍या या विश्रामगृहात नेहमीच गर्दी असते. वेंगुर्ले बंदर, दिपगृह, मार्केट, दाभोली मठ, निशाण तलाव याबरोबरच वेंगुर्ला प्रसिद्ध आहे ते इथल्या मंदिरासाठी.

रेडीचा गणेश

येथे स्वयंभू गणेश मूर्ती असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभूज गणेश मूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृष्य दिसते.

शिरोडा

हे गाव पूर्वी 'शिरवडे' या नावाने परिचित होते. पुढे अपभ्रंश होऊन 'शिरोडा' हे नाव प्राप्त झाले. या गावास ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३० सालचा मिठाचा सत्याग्रह याच गावी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मीठ पिकवणारे एकमेव गाव म्हणूनही शिरोड्याचा लौकिक आहे. परिसरात नारळाच्या झाडांच्या अनेक राया आहेत. तसेच काजूंचीही अनेक झाडे आहेत. जवळच यशवंतगड नावाचा पुरातन किल्ला आहे. छत्रपतींच्या काळात त्यास विशेष महत्त्व होते.

आरवली

शिरोड्यापासून एक किमी. अंतरावर 'आरवली' गाव आहे. येथील वेतोबाचे देवालय आदर्श नमुना मानला जातो. वेतोबाची भव्य पंचधातूची मूर्ती आणि भाविकांची अपार श्रद्धा यामुळे या गावाला आगळेच महत्त्व आहे. नजिकचे सातेरी मंदिर आणि तेथिल मूर्तीही दर्शनिय आहे. वेतोबाची जत्रा आणि नविन मूर्तीची पूनर्प्रतिष्ठापना वर्धापन उत्सव हे सिंधुदुर्गवासियांचे आकर्षण आहे.

मोचेमाड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्वाच्या वैभवाची साक्ष देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला गेलेला पर्यटन प्रकल्प 'मोचेमाड' परिसरात साकारणार आहे. मोचेमाड किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या असून पर्यटन तज्ञांच्या मते त्याचा उपयोग 'सी डायव्हिंग स्पोर्टस' या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्‍याबरोबरच पांढरी शुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. याच परिसरात किनार्‍यांवरील लाटा व सागरी वारे यांच्यामुळे नैसर्गिक वाळूच्या भिंती तयार झालेल्या असून त्याचा उपयोग वाळूवरील 'स्केटींग' या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. दूध, भाजीपाला तसेच कुक्कटपालन यासारखे लहान मोठे व्यवसाय उभे राहून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे 'दशावतार ' सारखे कार्यक्रम देशी-विदेशी नागरिकांना दाखविण्यात येणार असल्याने कला-नाट्य क्षेत्रासही चांगले दिवस येणार आहेत.

रमणीय सागरेश्र्वर

वेंगुर्ला-शिरोडा रस्त्याने अर्थात नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला शहरापासून अवघ्या सुमारे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे सागरेश्र्वर मंदिराच्या दिशेने काही अंतर जावे लागते. मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे. तसेच भाविकांसाठी छोटेखानी धर्मशाळाही आहे. 'सागरेश्र्वरच्या' वाळूत तासनतास बसावे, सागराचे निरीक्षण करत, वाळूत खेळावे, किल्ले बांधावेत, भरतीच्या वेळात किनार्‍यास येऊन भिडताना तयार होणार्‍या अर्ध गोलाकार नागफणीच्या आकाराच्या सागरी लाटांच्या भिंती व हा हा म्हणता जाणवणारा त्यांचा क्षणभंगुरपणा न्याहाळणे हा देखील कोणाचा आवडता छंद असू शकतो.

सावंतवाडी

सावंतवाडी म्हणजेच 'सुंदरवाडी' या शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. या शहरात राजवाडा, लाकडी फळे, फुले (हस्तकला), मोती तलाव, नरेंद्र डोंगर, जगन्नथराव भोसले उद्यान, आत्मेश्वर तळी, व शिल्पग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक स्थिरावतात. 'सावंतवाडी' हे शहर संस्थान काळातील खेमसावंत-भोसल्यांची राजधानी होती. सावंतवाडीतील 'चितार आळी' हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकांनांनी गजबजलेला असतो. सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात.

मोती तलाव

तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास "मोती तलाव" असे नाव पडले. चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तलावात कारंजे सुध्दा बसविण्यात आलेले आहेत. तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

निसर्ग कोंदण - आंबोली

आंबोली हे ठिकाण सावंतवाडीपासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे याठिकाणी पर्यटक निवास बांधले आहेत. शासकीय व वन खात्याचे विश्रामगृह तसेच खासगी हॉटेल्सही या ठिकाणी आहेत. सर्व हंगामात पर्यटकांची वर्दळ येथे सुरु असते. हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोलीजवळच होतो. शंकराचे स्थान असल्याने तेथे महाशिवरात्रीस यात्रा भरते. आंबोली घाटातून दिसणारी सह्याद्री पर्वताची रुद्र रुपे चिरकाल स्मरणात राहतील, अशीच आहेत. अत्यंत आल्हाददायक हवा, सभोवताली दाटलेली गर्द झाडी, कधी हलके-फुलके विरळ धुके तर कधी दाट धुक्यांची दुलई पांघरलेला आसमंत, पावसाळी हंगामात धो-धो कोसळणारे असंख्य धबधबे-निर्झर, आंबोलीच्या घाटमाथ्यावर कधी टकरा घेणार्‍या तर कधी रेंगाळणार्‍या ढगांच्या मालिका, कड्यावर उभे राहिले असता खालून वेगाने येऊन आदळणारा वार्‍याचा, अवखळ झोत, दर्‍या-खोर्‍यांची भव्यता, गिरी-शिखरांची उंचाई, ही सारी सृष्टीची नवलाई आणि दिव्यत्व अनुभवण्यासाठी आंबोलीसच जायला हवे. उंच कड्यावरुन तळ्कोंकणातील दृष्ये तासनतास निरखित राहणे, ही येथील एक अपूर्वाई! आंबोली परिसरात असे ९-१० पॉईंटस् आहेत.

मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळे

सिंधुदुर्ग किल्ला- मालवण नजिक भरसमुद्रात "सिंधुदुर्ग" हा जलदुर्ग आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करत खंबीरपणे उभा आहे. इ. स. १६६४ मध्ये 'कुरटे' नावाने ओळखल्या जाणार्‍या या बेटावर ४१ एकर क्षेत्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याची उभारणी केली. सागरी आरमाराचे हे तत्कालीन महत्त्वाचे ठिकाण होते. किल्ल्यास ३२ बुरुज आहेत. तटबंदी भक्कम व नागमोडी वळणाची आहे. किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवरामेश्र्वर मंदिर आहे. तसेच महाराजांच्या हाता-पायाचे ठसे जतन करुन ठेवण्यात आले आहेत.

निसर्गकन्या "तारकर्ली"

मालवणच्या बंदरापासून ते तारकर्ली, देवबागपर्यंत सुमारे १२ कि. मी. लांबीची आकर्षक किनारपट्टी आहे. या शांत रम्य अशा ठिकाणी तंबुनिवास व रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे. येथील किनारा जलविहारासाठीही प्रसिध्द आहे.

देवबाग

देवबागला तारकर्लीची खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. कर्ली नदीचे  विस्तीर्ण, रुंद पात्र, नदीमुखातून देवबागकडे जाताना दोन्ही किनार्‍यांवर दाटलेल्या हिरव्यागर्द माडांच्या व पोफळीच्या बागा, नदीचा संथ, शांत व सुरक्षित प्रवास, नदीपात्रात लागणारी छोटी मोठी नवलाईची बेटे, पात्रालगत असंख्य माडांच्या अंधारछायेत असणारी कोकणी परंपरेची घरकुले, समोर दिसणारी तुळशी वृंदावने ही सारी दृष्ये पाहत पाहत देवबागकडे सरकत जाणारी नौका हा अनुभव म्हणजे चिरकाल स्मरणात राहणारी एक आनंदयात्राच होय !

धामापूर

धामापूर  या निसर्गरम्य गावात भगवती मंदिरालगत सुंदर असा तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी मर्यादेच्या पलिकडे या तळ्यातील पाणी वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही. हे तलाव विस्तीर्ण व विहंगम असल्याने येथे येणारे पर्यटक काही क्षण तरी स्वतःला हरवून जातात.

दोडामार्ग

या नव्याने उदयास आलेल्या तालुक्यात ही अनेक पर्यटनाची ठिकाणे विलोभनीय आहेत.

तिलारी धरण

तिलारी धरण हा प्रकल्प येथे साकारल्याने येथील निसर्गनिर्मित सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. येथील उन्नेयी बंधारा व नागनाथ मंदिर दिलखेचक आहे. तर पारगड किल्ला ऐतिहासिक ठेव आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून आराखडे तयार होत असून निधीचाही विचार होत आहे.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 8 पाहुणे; सदस्य नाहीत