सारांश: आपल्या भारतात अगणित पर्यटन स्थळे आहेत आणि त्यातील प्रत्येकाला एक आगळे महत्व आणि वैभव स्थान आहे. कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारं, आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यानी आकर्षित करणारं आणि रसना पुर्तीला निमंत्रण देणारं शहर आहे.
सारांश: महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या नयनरम्य तारकर्ली गावातील निसर्ग पहाताना, स्कुबा डायव्हिंग करताना आणि जिभेचे चोचले पुरवताना मिळणारा आनंद तुमची रात्र नक्कीच स्मरणीय करील.
दापोलीहून परतल्यावर चिपळूणला हायवेवरच्या एक साध्याच हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. पहाटे लवकर जाग आली. अंघोळ आटोपून खाली उतरलो तर सातच वाजले होते. पहिला चहा तयार होत होता. चहा घेऊन बाहेर आलो तर संपूर्ण शहर धुक्यात बुडालेले दिसले. अगदी ५० मीटर वरचे सुद्धा काही स्पष्ट दिसत नव्हते. लोक म्हणाले की १० वाजे पर्यंत तरी धुकं निवळणार नाही. मध्ये परत ३-४ चहा झाले. शेवटी नऊ वाजता बाहेर पडलो कारण परशुराम घाट पाहण्यासाठी जवळजवळ अकरा की.मी. मागे जायचे होते. घाटातला देखावा फारच मनोहर होता. खरेतर खाली जमिनीवरून सूर्य दिसत नव्हता पण घाटातून सर्वदूर पसरलेली धुक्याची सफेद चादर व त्यावर चकाकणारी सूर्य किरणे दिसत होती!! थोड्या वेळाने मंदीराकडे पोचलो. परशुरामाच्या भूमीत जन्म घेऊनही मी आजवर परशुरामाचे मंदीर पहिले नव्हते त्यामुळे मला फारच उत्सुकता लागून राहिली होती. मंदीर फारच सुंदर आहे आणि तेथील अन्य व्यवस्थाही फार उत्तम आहेत.
पोलादपूरला सकळी नऊ वाजता नाश्ता केला होता व त्यानंतर काहीच खाल्ले नव्हते पण त्याचा जास्त विचार न करता सरळ विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. सुरुवातीलाच दिसलेला विद्यापीठाचा नकाशा (Layout) पाहून एवढ्या प्रचंड आवारात फिरायल किती वेळ लागेल याचा हिशेब सुरू झाला. प्रथम प्रशासकीय कार्यालयात गेलो तर त्यांनी पुन्हा मला चक्क बाहेरचा रस्ता दाखवत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात जाण्यास सांगितले. तिथे पोचल्यावर स्वागत कक्षातील चव्हाण बाईंनी हसून स्वागत केले त्यामुळे आपण योग्य ठिकाणी पोचलो आहोत याची खात्री वाटली.
हरिहरेश्वर MTDC मध्ये सकाळी जाग आली तेंव्हा ७ वाजले होते. रातीच्या काळोखात जाणवले नव्हते पण सकाळी पाझालेले पहिले इम्प्रेशन म्हणजे हॉटेलची व्यवस्था सुमार दर्जाची असली तरी परिसर मात्र अतिशय निसर्गरम्य होता. विकएंडला २-४ दिवस काढायला फार छान व निवांत वाटेल. चालत खाली कॅन्टीनला चहासाठी गेलोतर तिथे कुणी उठलेही नव्हते. जरा पुढे जाताच लाटांचा आवाज आला आणि मग सकाळच्या सूर्याचे मनोहर दर्शन झाले. मागे परतताना झाडांमधली खसखस ऐकली, चक्क दोन लांडोरी चरत होत्या. अंघोळीनंतर हरिहरेश्वराच्या मंदिराकडे निघालो. बाजूलाच काल भैरवाचे मंदिर आहे. इथून पाहताना समोरच्या सागर किनाऱ्याचे फार छान दर्शन होते. अजूनही बराच प्रवास करायचा असल्याची जाणीव सतत असल्याने आता आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने निघालो.
जवळ जवळ दोन वर्षांनी पुन्हा भारत भेटीचा योग आला. यावेळी मात्र माझा मुख्य कार्यक्रम होता - कोकण दर्शन. मी, माझी पत्नी, माझी मेव्हुणी, तिचा नवरा व मुलगा असे पाचजण यु.के. हून ३ नोव्हेंबरला रात्री उशिराने बाहेर पडलो. यावेळी दुबईला मेव्हण्याकडे चार दिवसांचा मुक्काम होता. ४ तारीखला सकाळी ८ च्या दरम्यान दुबईत पोचलो. तिथे आमच्या अगोदरच माझी मुंबईकर मेव्हुणी सहकुटुंब पोचलेली होती. नोव्हेंबरमध्ये दुबईची गरमी विशेष जाणवत नाही त्यामुळे दुपारी १२ पासूनच दुबई फिरायला सुरुवात झाली. तीन मुलं, पाच बायका व चार पुरुष, शॉपिंगला किंवा फिरायला जायचं तर एवढा घोळ असायचा की त्यात बराच वेळ वाया जात असे. शेवटी सर्वानांच चार दिवस अपुरे वाटले. सात तरीखला रात्री १०.३० चं फ्लाईट होतं पण संध्याकाळचे सात वाजले तरी काहीजण शॉपिंग हून परतले नव्हते. पुढच्या वेळी नोव्हेंबर/डिसेंबर मध्येच जायचं व एक आठवडा तरी मुक्काम करायचा असं वाटू लागलं. ८ तरीखला पहाटे चार वाजता मुंबईला पोचलो. मुंबई मला मुळीच आवडत नाही त्यामुळे दुसरे दिवशीच मी बहिणीकडे खारघरला सटकलो. पाच दिवस मस्त पत्रावळी झाल्या. खारघर सेक्टर १० म्हणजे नुसतचं सीमेंटच जंगल, चालायला धड रस्ता पण नाही त्या मुळे बाहेर पडलोच नाही. बऱ्याच वर्षांनी एक छान मराठी सिनेमा पहिला - देऊळ. शेवटी १४ तरीखला माझ्या कोकण दर्शन यात्रेला मुहूर्त मिळाला. अलिबाग ते गोवा असा एकूण १०-१२ दिवसाचा बेत होता त्यामुळे कुणीच माझ्या बरोबर यायला तयार होईना. त्यामुळे एकंदरीत भारतातील ट्राफिक, ड्रायव्हिंग आणि दीर्घ प्रवास यांचा विचार करता सेल्फ ड्राईव्ह कॅन्सल करून मी खारघर हून एक छोटीशी गाडी ड्रायव्हर सहित भाड्याने घेतली. सकाळी ११ च्या सुमारास खारघर हून निघालो.
मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो. आम्ही विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. फिरणारी माणसं वेगळी. आम्ही फक्त वर्षातून एकदा मामाकडे आणि गावाला जायचो.
आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.











