वेंगुर्ल्यात जत्रा म्हणजे पर्वणीच. किती देवळे व किती जत्रा, किती नाटक कंपन्या, गजबजलेली जत्रा पहावी तर वेंगुर्ल्यातच.
त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीची पहिली जत्रा व नंतर एकदा तशीच रामेश्वराची ही दुसरी जत्रा. जत्रा म्हटली की शाळा अर्ध्या दिवसाने सुटायची. आम्ही येतानाच देवळात फिरुन यायचो. देऊळ स्वच्छ केलेले असायचं. नविन रंगकाम, फुलांच्या माळा, अगरबत्तीचा वास, देऊळ प्रसन्न व्हायचे.
आवारात दुकानदार दुकान मांडायला सुरु करायचे. केळीवाल्या बायका आपापल्या वार्षिक जागा हेरुन बसायच्या. फुलवाल्या बायका, खेळणीवाले, मिठाई / खाजेवाले, फुगेवाले किती प्रकारची दुकाने, सगळीकडे दुकानांची मांडामांड. तरी दुपारी कसं थोडं उघडं उघडं वाटायचं.











